कणकवली शहरातील गुन्हे उघडकीस आणणारी "सीसीटीव्ही यंत्रणा बंद"....पोलीस प्रशासनाचा बेजबाबदारपणा-यंत्रणा झोपलेल्या अवस्थेत...उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा प्रशासनाला सवाल
नवप्रभात NEWS / कणकवली
कणकवली तालुका हा जिल्ह्याचे मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. याठिकाणी विविध तालुक्याच्या नागरिकांची रहदारी असते. त्यामुळे कणकवली शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा चालू असणे फार महत्वाचे आहे सध्या शहरातील सीसीटीव्ही पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अधिपत्याखाली शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींचे कारण सांगत ही यंत्रणा सध्या निष्क्रिय झाली आहे. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त होत असून, तातडीने याकडे लक्ष देऊन सीसीटीव्ही सुरू करावेत, अशी मागणी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली आहे.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखली जाणारी ही यंत्रणा बंद पडल्याने गुन्हे तपासात अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरते. यापूर्वी शहरात घडलेल्या अनेक चोरी व घरफोड्यांचे धागेदोरे याच कॅमेऱ्यांमुळे लागले होते. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कार्यरत असताना शहरातील चोरी व घरफोड्यांच्या घटनांमध्येही लक्षणीय घट झाली होती. दरम्यान, कणकवलीतील युवा शिवसैनिक तसेच बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खूनप्रकरणाच्या तपासादरम्यानही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. जर ही यंत्रणा कार्यरत असती, तर दळवी यांच्यासोबत त्या वेळी नेमके कोण होते, याबाबत स्पष्ट माहिती समोर आली असती आणि तपासाविषयी निर्माण होणाऱ्या शंका टाळता आल्या असत्या, या बंद असलेल्या सीसीटीव्ही यंत्रनेला जबाबदार कोण ? शासनाच्या डीपीडीसी निधीतून बसविण्यात आलेल्या या सीसीटीव्ही ची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली होती, पण आताच्या स्थितीत बंद असलेल्या सीसीटीव्ही मुळे नागरिकांमधून पोलीस यंत्रनेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि रात्री वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सध्या तीच यंत्रणा बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कणकवली शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अन्यथा पोलीस प्रशासनास जाब विचारनार असा इशारा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. यामुळे या प्रश्नावर आता शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Post a Comment
0 Comments