बीएसएनएल टॉवर कार्यान्वित न झाल्याने उपोषणाचा इशारा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरीचरणगिरी तिठा-आवेरा याठिकाणी बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. गेले सात-आठ महिने होऊनही हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री स्थापित केलेली नसल्यामुळे तो कार्यान्वित होऊ शकलेला नाही त्यामुळे येत्या १५ दिवसांत भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित न केल्यास दि. २१ मार्चपासून या भागातील ग्राहक व नागरिकांसमवेत सावंतवाडी येथील मुख्य बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर तीव्र उपोषण केले जाईल, असा इशारा वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांनी दिला आहे.
हरचिरणगिरी तिठा-आवेरा याठिकाणी भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आलेला आहे. हा मनोरा मागील सुमारे ७ ते ८ महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला आहे. अद्यापपर्यंत मनोरा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आस्थापित केलेली नसल्यामुळे मनोरा कार्यान्वित होऊ शकलेला नाही. मनोरा ज्या जागी बांधलेला आहे, त्याच्या आसपास अन्य कुठल्याही कंपनीच्या ध्वनीलहरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे येत्या १५ दिवसांत भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित न केल्यास, या मागणीसाठी गावातील सह्या केलेल्या ग्रामस्थांसमवेत दि. २१ मार्चपासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. तरी हा मनोरा तात्काळ कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. ही मागणी वायंगणी सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांनी लेखी पत्राद्वारे सावंतवाडी येथील दुरध्वनी केंद्राच्या सहाय्यक अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ६ मार्च रोजी केली आहे.
Post a Comment
0 Comments