महिला तलाठी व ग्रामसेवकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली-वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी महिला तलाठी व ग्रामसेवकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण प्रशासनाच्या बळकटीकरणामध्ये महिला तलाठी व ग्रामसेवक यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे, महसूल व ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे, गावांच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविणे आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणे यामध्ये त्यांची भूमिका मोलाची ठरते. त्यांच्या अनुभवांना, विचारांना आणि कार्यातून आलेल्या जाणिवांना अभिव्यक्ती मिळावी, या उद्देशाने या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या स्पर्धेसाठी "ग्रामीण प्रशासनातील महिला शक्ती" हा विषय निश्चित करण्यात आला असून राज्यातील सर्व आजी-माजी महिला तलाठी व ग्रामसेवकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. सहभागी स्पर्धकांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांत स्वहस्ताक्षरात मराठी भाषेत निबंध लिहून सादर करावयाचा आहे. निबंधासोबत तलाठी किंवा ग्रामसेवक म्हणून कार्यरत असल्याचे अथवा सेवा बजावल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास रोख ₹१०००, द्वितीय क्रमांकास ₹७०० आणि तृतीय क्रमांकास ₹५०० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार असून त्यासोबत प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹२५० रोख, प्रमाणपत्र व चषकासह देण्यात येतील.
स्पर्धेसाठी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु.पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१५ या पत्त्यावर दिनांक २० जुलै २०२६ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.
या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस आजी-माजी महिला तलाठी व ग्रामसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments