नवप्रभात NEWS / मुंबई
३ जुलै आणि ४ जुलै रोजी खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) ने त्यांच्या रिचार्जच्या किमतीत ११ -२५ % दरवाढ केली. त्यामुळे आता अनेक ग्राहक भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSNL कडे वळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने BSNL च्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे. ही संख्या थोडी थोडकी नसून, लाखोंमध्ये आहे.
एकीकडे खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत, तर दुसरीकडे BSNL ग्राहकांना कमी किमतीत चांगले रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. त्यामुळेच BSNL च्या ग्राहक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतर सुमारे २५ लाख ग्राहकांनी BSNL चे नवीन नंबर घेतले आहेत, किंवा त्यांचे जुने नंबर पोर्ट केले आहेत.
BSNL वेगाने 4G रोलआउटकडे वाटचाल करत असून, सरकार त्याला लवकरच 5G मध्ये बदलण्याचा विचार करत आहे. आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा केल्यानंतर BSNL च्या ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, कंपनी आपल्या नवीन ग्राहकांना मोफत सिमकार्ड देत आहे. ही लॉन्चिंग ऑफर तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे.
BSNL ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, BSNL 4G आणि 5G नेटवर्कसाठी देशभरात सुमारे १.१२ लाख टॉवर्स बसवणार आहे. कंपनीने आतापर्यंत १२,००० 4G टॉवर बसवले असून, त्यापैकी ६,००० टॉवर पंजाब, उत्तर प्रदेश पश्चिम, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा मंडळांमध्ये ॲक्टिव्ह आहेत. लवकरच देशभरातील इतर राज्यांमध्ये याचा विस्तार केला जाईल. BSNL ने 4G सेवेसाठी TCS, तेजस नेटवर्क आणि सरकारी ITI सोबत भागीदारी केली आहे.
Post a Comment
0 Comments