जलजीवनची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
आ. नितेश राणे यांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी
नवप्रभात NEWS / ओरोस
कणकवली व वैभववाडी तालुक्यातील जलजीवनं मिशनची कामे पिता-पुत्र असलेल्या ठेकेदारांनी केली आहेत. ही सर्व १७ कामे निकृष्ट झाल्याची तक्रार जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने माझ्याकडे केली आहे. त्यामुळे या दोघांनी केलेल्या जलजीवनच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करण्यात यावी व त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी आ. नितेश राणे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
कणकवली मतदारसंघातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील सुमारे १७ कामे शासकीय ठेकेदार असलेल्या त्या पिता- पुत्रांनी घेतली आहेत. त्यांच्या कामांच्या तक्रारीबाबत आपण योजनेचे सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता श्री. महाजनी याना आढावा बैठकी दरम्यान प्रत्यक्ष जातीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. परंतु सदर ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने अनेक योजनांची कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाची कामे केल्याने जनतेला ऐन उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. त्याचा रोष जनता सरकारवर व्यक्त करीत आहे, अशी तक्रार आ. राणे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
Post a Comment
0 Comments